गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

पाण्याच्या नियोजनाशिवाय वाढणारी प्रगती (?)

ऊद्योगधंदे आणि अंधाधुंद शहरीकरण म्हणजेच प्रगती ह्या " विकासाच्या मागास संकल्पनेमुळे " गेल्या दिड - दोन दशकांपासून महानगरांची संख्या आणि विस्तार वाढत गेला पण प्रत्यक्षात ऊद्योग व्यापार आणि लोकसंख्येचे केंद्रिकरण असणारी हि शहर वसवताना - विस्तारताना पाण्यासारख्या सर्वात महत्वाच्या मुलभुत गरजेला नियोजनाच्या केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी नेमक्या त्या जागीच भुमीच्या प्रत्येक ईंचाला गिळू पहाणारा स्वार्थ बसल्यामुळे शहरातले , शहरालगतचे जलस्त्रोत ( तळी , विहिरी , नदि ई. ) आधी दुर्लक्षित होऊन मग स्वत:च विकासातील (?) अडथळा ठरून कुजवले - बुजवले जाऊन वर लोकसंख्येने वाढत जाणार्या ह्या शहरांच्या आकारमानाच्या सीमेलाहि कोणतीच सीमा ऊरत नाहि. त्याचवेळी जमिनीशी नाते तुटल्यामुळेच की काय एकीकडे संपुर्ण भुमीचे कॉंक्रिट - पेव्हर ब्लॉकीकरण आणि दुसरीकडे बोअरवेल्सद्वारे सुरू प्रचंड पाणीऊपसा ह्या विरोधाभासी वास्तवाने काहि काळानंतर भुजलहि रसाताळाला जाऊन शहरातील एकमेव हक्काचा जलस्त्रोतहि नष्ट होण्याप्रत पोहोचतो आणि प्रगतीचा आत्मा म्हणवणार्या महानगरातील जीवन ह्या " जीवना"बाबत पुर्णत: परावलंबी ठरून त्याची तहान शेकडो कि.मी दूरवरच्या धरणांतुन भागते . [ मित्रांनो ईथेहि आपण ( दुरून पाणी आणताना आपली आर्थिक क्षमता , गरज ई. अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करून ) पाश्च्यात्यांची नक्कल केली आहे. ]


भारतात शहरांची तहान भागवणारी हि धरण बहुतेकवेळेस सिंचनधरणे असतात. आणि त्यामुळे देशातील सरकारी पातळीवरील ह्या गलथानपणामुळे शहरवासियांची ह्या धरणांशेजारील गाव आणि बळीराजाशी नकळत स्पर्धा सुरू होते आणि देशात भारत - ईंडीया अशी ऊभी फुट पडते.

मुळात ह्यात प्रशासनाचे माप अनेकदा गावकरी आणि शेतकर्यांऐवजी शहर - महानगरांच्या बाजुने झुकताना दिसत असले तरीहि शहरात पाणी गळती - चोर्यांच्या रूपात सातत्याने सुरू पाण्याचा चिंताजनक अपव्यय , एकाच शहरातील पाणी वाटपातील विषमतेसारख्या प्रकारांमुळे ज्यांच्यासाठी हा दूरून पाणी आणण्याचा खटाटोप सुरू असतो ती शहर-महानगरातील जनताहि भीषण पाणी टंचाई आणि टॅंकर लॉबीच्या दबंगईने त्रस्त असते. त्यातहि अश्याप्रकारे सर्वसामान्यांच्या हाती पडलेल्या पाण्याच्या शुध्दतेबाबतहि " आनंदिआनंदच " असल्याने मुंबईसह राज्यातील ईतर शहरांमध्ये जलजन्य आजार सर्वसामान्यांसाठी बारा महिने तेरा काळ गहन चिंतेचा विषय ठरून सर्वसामान्यांना ह्या पाण्यावर " शुध्दीकरणाचे संस्कार " करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या खिषाला जाळून मगच हे पाणी मुखात घेता येते.

तर मित्रांनो अश्याप्रकारे ह्या "जीवनासाठीच्या" जीवघेण्या स्पर्धेत वरवर विजय कुणाचाहि होताना दिसला तरीहि प्रत्यक्षात गाव-खेड्यातील असो किंवा शहर-महानगरातील सर्वच ठिकाणी पराभव होत असतो समाजाचा ! कारण माझ्या - तुमच्यापासून बनलेला हा समाज भोगत असतो शाप राज्यकर्त्यांच्या चुकीच्या नियोजनाचा !


- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.

posted from Bloggeroid

1 टिप्पणी:

  1. वास्तववादी लिखाण सरजी!!! ग्रामीण जीवनावार सत्ताधार्यांचे लक्ष दिसत नाही.

    उत्तर द्याहटवा